Friday, 21 August 2020

व्यक्त होणं...


हे व्यक्त होणं म्हणजे नेमकं काय?

याचे नेमके प्रकार तरी किती?

याचे काय आणि कसे परिणाम होतात?

ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत. आपण आपल्या आयुष्याबाबत विचार केला तर, खरं तर किती सोप्प असतं व्यक्त होणं. पण थोडं बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की खरंच हे इतकं सोपं असतं का? किंवा आपल्या व्यक्त होण्याचे परिणाम काय होतील याचा कधी विचार केला जातो का? घटना घडली की आपण कशी प्रतिक्रीया देतो? त्वरेनं, त्वेषानं की शांत आणि संयतपणे ह्यावर नक्की विचार व्हायला हवा.

साधी घटना घेऊ की आपल्या घरात एक लहान मूल असतं. आणि मूल म्हटलं की ते त्याच्याच विश्वात रममाण झालेलं असतं. त्याचं विश्व म्हणजे त्याची आई आणि घरातले त्याच्या आजूबाजूला असणारे बाकीचे सदस्य. त्याला नेमकं काय हव असतं तर आपलं लक्ष सतत त्याच्याकडे कसं असेल. त्यासाठी ते नानाविध क्लूप्त्या अवलंबत. म्हणजे अगदी लहान मूल भूक लागली तर रडेल, खूष असलं तर हसेल. थोडं मोठ मूल ज्याला हळू हळू चालता, बोबडे बोल बोलता येत असतील तर ते त्यापरीनं वागेल. महत्वाचं काय असतं की आपण ज्यापद्धतीनं त्याच्याशी वागू तसं ते वागत असतं. अर्थात व्यक्त होतं. त्यानं आदर्श मुल, विद्यार्थी, जबाबदार नागरिक, सुजाण पती/ पत्नी व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर आपणच विचार करायला हवा. म्हणजे जशी आपली वागणूक असेल तसंच त्याचं व्यक्तीमत्व घडेल (अर्थात व्यक्त होईल) हे ध्यानी ठेवायला हवं.

व्यक्त होण्याची सामाजिक बाजू पाहिली तरी न राहवून मुंबईमध्ये घडलेली घटना नजरेसमोर आल्यावाचून राहत नाही. घटना घडली त्याची तारीख होती ती तारीख १२ ऑगस्ट २०12. रझा अकादमीच्या पुढाकारानं मुंबईमध्ये आझाद मैदानाजवळ १५०० माणसं जमून म्यानमार मध्ये घडलेल्या घटनेचा म्हणजेच तेथील बौद्ध नागरिक आणि तिथे बाहेरून गेलेले रोहिंग्या मुस्लिम ह्यांच्या मध्ये उसळलेल्या दंगलीचा निषेध करणार होते. अर्थात त्याबाबत खूप काही लिहीलं गेलं आहे. आपण त्याबाबतची सारी माहिती आंतरजालावर पाहू वाचू शकता. ईथे त्याचा फक्त उल्लेख केला तरी पुरेसा आहे. एकत्र येणं, निषेध करणं इथवर सारं काही ठिक होतं. पण १५०० लोकांच्या जमण्याची सुचना देऊन ४०,००० हजार लोक जमले आणि त्या निदर्शनांना जे हिंसक वळण दिलं गेलं ते अत्यंत चुकीचं होतं. त्या घटनेचा थेट आणि दूरगामी परिणाम ज्या समाजघटकांवर, पोलिस बांधवांवर, त्यांच्या कुटूंबीयांवर आणि त्यांच्या आयुष्यावर झाला त्याला जबाबदार कोण हा फार गहन आणि अनुत्तरीत प्रश्न उरतो.

क्रिया आणि त्यावरच्या प्रतिक्रीया ह्यावरच आपलं आयुष्य चाललेलं आहे. व्यक्त होणं ही खरं तर एक अंतर्मुख होण्याची बाब आहे. प्रत्येक प्रसंगी आपण कसे व्यक्त होतो, त्यावर समोरच्या व्यक्तीची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी ठरते. आपल्याबद्दलचं मत तयार होत असतं. किंबहुना त्यावर आपली समोरच्या व्यक्तीवर एक अमीट अशी छाप पडल्याशिवाय राहत नाही. रोजच्या आयुष्यातल्या घटना त्यावर आपल्याकडून येणाऱ्या प्रतिक्रीया, त्याचे आपल्या आयुष्यावर, आपल्या संबंधीतांवर परिणाम होत असतात. ह्यामध्ये शांत आणि संयतपणे व्यक्त होणारी व्यक्ती हीच अनुकरणीय ठरते.

आयुष्य हे सुंदर आहेच पण ते अधिक सुंदर आणि अनुकरणीय, आदर्शवत करण्यासाठी मला आत्यंतिक महत्वाची वाटणारी बाब म्हणजे व्यक्त होणं. त्यामूळे व्यक्त व्हा... पण जपून...

इती लेखनसीमा.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

No comments:

Post a Comment