परवा एका मित्राच्या काकांचं निधन झालं. त्यानिमीत्ताने आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याचा पुनश्च एकवार प्रत्यय आला. कालपर्यंत जी व्यक्ती आपल्या सोबत चालत बोलत होती ती आजपासून आपल्यासोबत नाही. ही भावना किती भयावह आहे. ज्या व्यक्तीचं असणं आपल्यासाठी महत्वाचं असतं त्या व्यक्तीशिवाय पुढचं आयुष्य कसं कंठणार हा ही विचार त्यामागे असतो.
आपण काय आहोतच की रे... अरे आपल्याला काय होतंय... रोजचं आयुष्य जगतांना आपलं असणं हे आपण काय, वा इतरांनी काय गृहित धरणं किती चुकीचं आहे ह्याचा प्रत्यय पदोपदी येतो. घरातून कामासाठी म्हणून बाहेर पडणारा मनुष्य धड्याअंगानं घरी जाईलच याची शाश्वती नसते. पूर्वी काय झालं आणि उद्या काय होईल ह्या विचीत्र अवस्थेत राहून आपण आपलं जगणं कष्टी करत असतो. याचा अर्थ असा नाही की अगदी सर्वसंगपरित्याग केलेल्या माणसासारखं वागाव. परंतू वास्तवाचं भान असणं गरजेच आहे. उद्यासाठी हे हवं ते हवं... असं म्हणून रोजच्या जीवनातला आनंद न उपभोगणं, सदैव चिंतायुक्त आयुष्य जगणं ह्यासारखा दूसरा मूर्खपणा नाही. कवी, गीतकार श्री. संदीप खरे त्यांचा एका कवितेत सुरेख शब्द आहेत. ते म्हणतात की, "उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून... पर्वा आहे उद्याच नंतर..." माझं भविष्य सुखकर व्हायला हवं. मी सुखात रहायला हवं हे अगदी योग्य आहे. परंतू, आज अपरिमीत कष्ट करून जो उद्या मला भविष्यात उपभोगायचा आहे त्याचा आनंद उपभोगण्यासाठी जर मीच राहिलो नाही तर काही उपयोग आहे काय?
आपलं आयुष्य किती असतं? ह्या प्रश्नाचं माझ्यादृष्टीने एकच उत्तर आहे. आणि ते म्हणजे एका क्षणाचं. आनंद सिनेमामध्ये असलेला एक संवाद हेच तर सांगतो की, "बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नही." वास्तविक आयुष्यात जगत असताना ते आयुष्य एकेका क्षणामध्येच असतं. जो क्षण आज, आत्ता आहे तो नंतर नाही. सुखं, दुःख हे कायमचे नाहीत तर फक्त क्षणाचेच आहेत. त्यांचा पाठशिवणीचा खेळ हा कायम सुरूच राहतो. आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट घटना कायमच्या नसतात. आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तीचा सहवाससुद्धा कायमचा नसतो. आपल्याला हवे ते पसंतीचे क्षण जर का, जेव्हा हवे तेव्हा जगता येणार असतील तर आयुष्य एकसुरी होऊन जाईल. खरंतर आयुष्याचं सौंदर्य ह्या क्षणभंगुरते मध्येच आहे. जे शाश्वत नाही, जे कायम नाही तेच आयुष्य आहे. आणि तेच सुंदर आहे.
No comments:
Post a Comment